कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील मेंढपाळाच्या मुलाने UPSC मध्ये मोठं यश मिळवलं धनगराचा लेक झाला IPS | बिरदेव सिध्दापा डोणे |
शाब्बास पठ्ठ्या! डोंगरदऱ्या ते दिल्लीपर्यंतचा प्रवास! बिरदेव सिद्धप्पा ढोणे ह्या एका मेंढपाळाच्या पोराचा IPS होण्याचा खऱ्या अर्थाने अद्भुत प्रवास!
बिरदेव फक्त मेंढरं राखत नव्हते. ते स्वप्नं उराशी घेऊन रानोमाळ फिरत होते.
मित्रांनो, आज कित्येक विद्यार्थी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जिवाचं रान करत आहेत. अशातच कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला इतकी हलवून टाकते की, ती ऐकताना किंवा वाचताना आपले डोळे आपसूकच पाणावतात. UPSC परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे ह्या लहानशा गावात राहणाऱ्या बिरदेव सिद्धप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलाने जे साध्य केलं आहे, ते अशाच अश्रूंनी भिजलेल्या अभिमानाचं उदाहरण आहे.
एका साध्या धनगर वाडीतून सुरू झालेला मोठा प्रवास!
बिरदेवचं बालपण, हे पुस्तकातलं नव्हे, तर वास्तवातलं होतं. त्याच्या घरात ना अभ्यासासाठी मोकळी खोली, ना इंटरनेट, ना कोचिंग क्लासेस. त्याच्या घरात होती फक्त दोन खोली आणि अंगणात वडिलांची मेंढरं. घरात पुस्तकांसाठी कपाट नव्हतं, पण डोक्यात विचारांचा कोलाज होता.
शाळेचा व्हरांडा. तोच त्याचा अभ्यासाचा कोपरा. डोंगरदऱ्यांमध्ये मेंढरं राखताना, हातात पुस्तकं असायची आणि मनात विचार .एक दिवस मी 'साहेब' होणार!
गावाच्या शाळेतून सुरुवात, पुण्याच्या कॉलेजपर्यंत झेप**
दहावीत तब्बल ९६% गुण, बारावीत विज्ञान शाखेत ८९%. या मुलानं एकेका टप्प्यावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. अभ्यासाच्या बळावर तो मुरगूड केंद्रात टॉपर झाला आणि पुढे पुण्यातल्या प्रतिष्ठित COEP कॉलेजमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीसाठी दाखल झाला.
पण एक लक्षात घ्या. त्याचा 'लक्ष्य' कोर्स नव्हता, त्याचा 'लक्ष्य' होता UPSC!
सामान्य विद्यार्थ्याच्या बाहेरची परिस्थिती कधी सोयीची नव्हती, पण आतली असामान्य ऊर्जा थांबत नव्हती.
UPSC ही परीक्षा ही केवळ अभ्यासाची नव्हे, तर मानसिक ताकदीची परीक्षाही असते. लाखो विद्यार्थी बसतात, पण यश मोजक्यांनाच मिळतं. बिरदेवसाठी ही परीक्षा म्हणजे 'स्वतःला सिद्ध करण्याची अंतिम संधी' होती.
निकाल जाहीर झाला, आणि त्याच्या मित्राचा फोन वाजला. तो त्या क्षणी कुठे होता माहितीये? बेळगाव जवळच्या धनगर वाड्यापाशी मेंढरं राखत होता. आणि निकालाची वार्ता कानावर आली .तू IPS झाला आहेस बिरदेव!
त्या क्षणाचा आविष्कार शब्दांत मांडणं अशक्य आहे. एका वाडीतून सुरु झालेला प्रवास, आता देशाच्या प्रशासन व्यवस्थेच्या सर्वोच्च पायऱ्यांपर्यंत पोहोचला होता.
आई-वडिलांचे डोळे भरून आले… गावाने फेटा बांधून साजरा केला.
गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. वाड्यांमध्ये वाजतगाजत सत्कार झाला. बिरदेवला गावकऱ्यांनी पिवळा फेटा बांधला. आईच्या डोळ्यात पाणी, पण त्यामागे दु:ख नव्हे. अभिमान होता. बापाच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा सांगत होती, माझ्या पोरानं नाव कमावलं!
ही गोष्ट एका व्यक्तीची नाही… ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाच्या यशाची!
बिरदेवचं यश आपल्याला काय शिकवतं? तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी ध्येय मोठं असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
- शहरातल्या चकाकत्या कोचिंग क्लासमध्ये नसलेलं यश, एखाद्या धनगर वाड्यात जन्मलेल्या मुलाने मिळवू शकतं.
माझं आयुष्य कठीण होतं, पण मी नेहमी मोठं स्वप्न बघत राहिलो. - बिरदेव सिद्धप्पा डोणे
बिरदेव आता भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी होणार आहे. पण त्याचं खरं काम आता सुरू होईल. कारण त्याला स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी काम करायचं आहे. त्याच्या यशातून आज अनेक मुलांना नवी दिशा, नवी प्रेरणा मिळते आहे.
शेवटी तुम्ही कुठून आलात, यापेक्षा महत्त्वाचं आहे.तुम्ही कुठं पोहोचू शकता!
बिरदेव सिद्धप्पा डोणे… या नावानं आता फक्त यमगे गावाचं नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उज्वल केलं आहे.
मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की परिस्थिती तुमच्याविरुद्ध आहे? तर मग एकदा बिरदेवची गोष्ट पुन्हा वाचा…
…आणि स्वतःलाच विचारा. मी काय करू शकतो?